Blogधान्य

Bajri lagvad in Marathi

Bajri lagvad

Bajri lagvad in Marathi बाजरी हे तृणधान्य मधील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्र मध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणावर बाजरीची लागवड केली जाते. भुईमुगाच्या तुलनेमध्ये बाजरी हे पीक कमी कालावधीमध्ये तयार होते व पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या दिल्यानंतर चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो. बाजरी या पिकाला कीड आणि रोगाचा उपद्रव जास्त होत नसल्यामुळे उत्पादन देखील जास्त मिळते. दुभत्या जनावरांसाठी आपण बाजरीचा चारा वापरू शकतो. आहाराच्या दृष्टीने देखील बाजरी हे चांगले तृणधान्य आहे. बाजरीमध्ये स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिज पदार्थ जसे की कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, लोह चांगल्या प्रमाणामध्ये आढळून येतो. लहान मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी बाजरी हे अत्यंत चांगले तृणधान्य आहे.

बाजरीच्या धान्याचा वापर हा भाकरी ,घाटा ,नूडल्स, खिचडी, आंबील, लाया, इडली अशा स्वरूपामध्य केला जातो. बाजरीच्या धान्यापासून मद्य निर्मिती देखील होते .पशुधन आणि कुक्कुटपालना मधील पशुखाद्य निर्मितीसाठी बाजरी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. बाजरीच्या पिकामध्ये 8.7 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. त्यामुळे पशुखाद्यासाठी बाजरी वापरली जाते. वर्तमान काळामध्ये बेकरी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाजरी वापरली जाते. बाजरीमुळे बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यासारखे , आजार बरे होतात. ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते, अशा महिलांनी बाजरीचा वापर आपल्या आहारामध्ये करावा. बाजरी हे ग्लूटन एलर्जी परिस्थितीला टाळण्यासाठी चांगला ठरतो कारण बाजरी हे ग्लूटन फ्री धान्य आहे .

लागणारी जमीन :

  • बाजरी या पिकासाठी हलक्या ते मध्यम प्रकाराची जमीन निवडावी.
  • बाजरी लागवडीसाठी जमिनीचा सामू हा 5.5 ते 7.5 या दरम्यान असल्यास उत्पन्न चांगले येते.
  • बाजरी पिकासाठी जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी निवडावी.
  • बाजरीचे उत्पन्न आपण हलक्या जमिनीमध्ये देखील खताचे आणि पाण्याचे योग्य नियोजन करून चांगले घेऊ शकतो.

लागणारे हवामान :

  • बाजरी या पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते.
  • कोरडवाहू जमिनीमध्ये आणि कोरडवाहू वातावरणामध्ये हे पीक तग धरते.
  • बाजरी या पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली असते.
  • उन्हाळी हंगामामध्ये पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या काळामध्ये तापमान कमी असल्यावर पिकाची वाढ हळू होते.
  • त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त वेळ लागतो, म्हणून उन्हाळी बाजरीची लागवड ही खरीप बाजरी पेक्षा दहा ते पंधरा दिवसांनी उशिरा काढण्यासाठी तयार होते.

सुधारीत जाती :

1. धनशक्ती :

या वाणाची लागवड केल्यानंतर सरासरी 74 ते 78 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीची कणसे घट्ट, दाणे टपोरे व धान्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. गोसावी या रोगासाठी हा वाण प्रतिकारक्षम असून या जातीपासून सरासरी 19 ते 22 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

2. शांती :

या जातीच्या ताटांची उंची मध्यम असते दाणे टपोरे आणि राखाडी रंगाचे असतात. या बाजरीची भाकरी चवीला चांगली लागते. ही जात देखील गोसावी या रोगासाठी प्रतिकाक्षम असून लागवड गेल्यानंतर सरासरी 80 ते 85 दिवसांमध्ये पीक काढणी साठी तयार होते.या जातीपासून हेक्टरी 30 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

3. आदीशक्ती :

ही जात मध्यम कालावधीमध्ये तयार होते. हा वाण गोसावी या रोगासाठी प्रतिकारक्षम असून कणसे घट्ट असतात. दाणे ठोकळ गोलाकार आणि राखाडी रंगाची असतात. बिया उत्पादकांसाठी फायदेशीर असा वाण असून लागवड केल्यानंतर सरासरी 80 ते 85 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. सरासरी 30 ते 32 क्विंटल हेक्टरी उत्पन्न या वाणापासून मिळते.

पुर्व मशागत :

  • बाजरी लागवडीसाठी जमीनीचे खोल नांगरण 15 सेंटीमीटर पर्यंत करावे आणि जमीन उन्हामध्ये चांगली तापून द्यावे.
  • चांगली जमीन तापल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन पूर्णपणे भुसभुशीत करावी.
  • अगोदर घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडीकचरा, कुंदा, हरळी वेचून सर्व शेत स्वच्छ करून घ्यावे.
  • शेवटचा कुळवाच्या अगोदर चांगल्या कुजलेले शेणखत, गांडूळ खत शेतामध्ये मिसळून घ्यावे आणि कुळवाच्या पाळी बरोबरच जमिनीमध्ये समप्रमाणामध्ये मिसळावे आणि जमीन एकसारखी करून घ्यावी.

पेरणीची वेळ :

  • महाराष्ट्र मध्ये बाजरीची पेरणी 15 जून ते 15 जुलै या दरम्यान केली जाते.
  • यादरम्यान पेरणी केल्यामुळे उत्पादन चांगले मिळते.
  • खरीप हंगामामध्ये पाऊस उशिरा झाल्यावर पेरणी 30 जुलै पर्यंत केली जाते.
  • बाजरी पिकाची पेरणी साधारणपणे 30 जुलै पर्यंत केल्यामुळे दहा टक्के पर्यंत घट होते.
  • शक्यतो जून महिन्यामध्ये पेरणी करावी.

पेरणीची पद्धत :

  • पेरणी करताना दोन ओळींमध्ये अंतर 45 सेंटिमीटर ठेवावे आणि दोन रोपांमधील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावे.
  • पेरणी करताना बिया 3 ते 4 सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • या प्रकारे पेरणी केल्यानंतर हेक्टरी 1.50 लाख रोपे बसतात त्यामुळे चांगले उत्पन्न मिळते.

विरळणी :

  • रोपांची संख्या योग्य आणि मर्यादित ठेवण्यासाठी पेरणी झाल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये विरळणी केली जाते. दोन रोपांमध्ये अंतर 15 सेंटीमीटर ठेवावे.
  • उगवण विरळ झाल्यावर उगवल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या अंतराने नागे भरून घेतले जातात.
  • पेरणीच्या नंतर 15 ते 20 दिवसांनी पाऊस चालू असताना रोपांची पुन्हा लागण केली जाते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

  • बाजरी लागवडीसाठी जमीन नांगरत असताना जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत टाकून घ्यावे.
  • जमिनीला पाण्याच्या पाळ्या देत असताना जमिनीमध्ये पाण्यासोबत जीवामृत देखील सोडावे.
  • त्यामुळे सूक्ष्म जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढते आणि उत्पन्न देखील चांगले येते.
  • बाजरी हे कोरडवाहू पीक आहे खरीप बाजरीसाठी पिकाला 25 ते 30 सेंटीमीटर इतकी पावसाची गरज असते.
  • परंतु पाण्याचा ताण पडल्यावर आणि पाणी उपलब्ध असल्यावर संवेदनक्षम अवस्थेमध्ये पाणी दिल्यावर उत्पन्न चांगले मिळते

1.पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी म्हणजेच पेरणीच्या वीस ते पंचवीस दिवसानंतर.

2.दुसरे पाणी पीक पोटरीत असताना म्हणजेच पेरणीच्या 35 ते 45 दिवसानंतर.

3. तिसरे पाणी दाणे भरताना म्हणजेच पेरणीच्या 60 ते 65 दिवसानंतर.

या संवेदनक्षम अवस्थेमध्ये पिकाला पाणी दिल्यावर उत्पन्न चांगले मिळते. पाण्याचे नियोजन जमिनीच्या मगदूराप्रमाणे करावे. जास्त काळापर्यंत पाणी शेतामध्ये साचून राहणार नाही याची योग्य काळजी घ्यावी पाणी साचून राहिल्यामुळे पिकाच्या मुळा कुजतात. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते आणि नुकसान देखील होते.

आंतर मशागत :

  • बाजरी हलक्या जमिनीमध्ये घेतल्यावर त्याच्यासोबत मटकीचे पीक घेतले जाते मध्यम जमिनीमध्ये केल्यानंतर तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जाते.
  • आंतरपीक घेत असताना दोन ओळींमधील अंतर 30 सेंटिमीटर एवढे ठेवावे आणि मग पेरणी करावी.

पीक संरक्षण :

महत्वाच्या किडी :

1. खोड किडा :

ही कीड वाढणारा शेंडा खाते त्यामुळे पाने वेडी वाकडी येतात आणि कापल्यासारखी दिसतात. रोंपाची वाढ खुंटते तसेच कीड कणीस देखील पूर्णपणे पोखरते त्यामुळे कणीस अर्धेच भरते .या किडीच्या प्रादुर्भाव दिसल्यानंतर जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. फवारणी घेत असताना वारा शांत असावा याची काळजी घ्यावी.

2. लष्करी अळी :

या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अळ्या सुरुवातीच्या काळामध्ये पानांचे पृष्ठभाग एका बाजूने खातात आणि दुसरी बाजू तशीच शाबूत ठेवतात. कळ्या आणि शेंडे नाहीसे होईपर्यंत रोपांना खाऊन टाकतात. कोवळ्या भागावर मोठ्या प्रमाणावर हल्ला दिसून येतो. जास्त संक्रमण झाल्यावरती पिक पूर्णपणे नष्ट होते. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी. शेतामधील तन नियंत्रण करावे, प्रतिकारक्षम जातींची लागवड करावी, प्रकाश सापळे किंवा कामगंध सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा ,पेरणी लवकर केल्यावर देखील आपण या किडीपासून आपल्या पिकाला वाचवू शकतो.

रोग :

1.अगरट :

या रोगाचा प्रादुर्भाव थंड आणि दमट हवामानामध्ये किंवा पावसाळ्याच्या वातावरण असल्यावर दिसून येतो. या रोगामुळे कंसात दाणे भरत नाहीत, फुलोऱ्या मधून मधासारखा चिकट द्रव बाहेर येतो .नंतर तो काळसर कठीण होतो .असे दाणे विषारी असतात त्यामध्ये अंगो टॉक्सिन हा विषारी पदार्थ सापडतो. असे धान्य खाण्यासाठी योग्य नसतात .असे दाणे खाल्ल्यामुळे विषबाधा होऊ शकते. या आरोग्यावर नियंत्रण करण्यासाठी उशिरा पेरणी करू नये , रोगट झाडे उपटून नष्ट करावेत, खोल नांगरट करणे गरजेचे आहे, पिकाची फेरपालट वेळोवेळी करावी आणि बीज प्रक्रिया करावी.

2. गोसावी :

या रोगाचा प्रादुर्भाव उगवणे झाल्यापासून ते दाणे भरेपर्यंत दिसून येतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोपे लहान असताना रोपांची पाने पिवळी पडतात आणि पानांवर चट्टे पडून पान पूर्णपणे तपकिरी होते. अशा झाडांची वाढ खुंटलेली दिसते व फुटवे जास्त फुटतात. कणीस मधील फुलांचे रूपांतर पर्णपत्रात होतात कंसात दाणे भरलेले दिसत नाहीत. कनिस विस्कटलेल्या केसासारखे दिसू लागते. या रोगाचे विषाणू झाडाच्या रोगट भागात जमिनीमध्ये तीन ते चार वर्षे राहू शकतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया करावी. पेरल्यानंतर नंतर पंधरा दिवसानंतर बुरशीनाशकांची फवारणी करावी रोगप्रतिकारक वाणांचा वापर करावा.

काढणी आणि उत्पादन :

  • बाजरीची लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 80 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.
  • बाजरी पीक सरसकट कापून घेतले जाते आणि मळणी मशीन ने मळले जाते किंवा फक्त कणसे खुडून घेतली जातात आणि त्यानंतर मळणी मशीन च्या सहाय्याने धान्य वेगळे केले जाते.
  • बाजरीचे उत्पन्न हे वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून असते जसे की जमीन, असणारे हवामान, वापरलेले सुधारित वाण, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, आंतरमशागत, खत आणि पाणी व्यवस्थापन, बाजरीचे सरासरी 40 ते 45 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते आणि चाऱ्याचे सात ते आठ टन एवढे उत्पन्न हेक्टरी मिळते.

👉 Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

👉 https://naturekrushi.com/category/grain

5/5 - (4 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *